हंपी आणि रामायण –
विजयनगरच्या उभारणीत या दगडांनी खूप भार वाहिला. त्या काळातल्या कारागीरांनी दगडात भोकं केली. त्यात लाकडाचे तुकडे टाकले, ते भिजवले. भिजवल्यावर लाकूड प्रसरण पावले. त्याने दगडात भेगा तयार केल्या आणि मग ते तोडले. ग्रॅनाईटवर त्या जखमांच्या खुणा आजही दिसतात. तुंगभद्रा नदी ही त्यांच्या जीवनाचा स्रोत आहे. ‘जीवन’ या शब्दाचा कोणताही अर्थ घ्या. तिथले दोन पर्वत महत्त्वाचे – एक मातंग डोंगर, दुसरा अंजेनाद्री. एक 115 मीटर उंच आहे, दुसरा 140 मीटर.
रामायणातला किष्किंधा प्रदेश म्हणजे हंपी असं मानलं जातं. हाच हनुमान, सुग्रीव, वाली वगैरे वानरांचा प्रदेश. इथे झुंडीच्या झुंडी माकडांच्या दिसतात. अर्थात हे काय मारुतीच्या वास्तव्याचं प्रूफ नव्हे. असं म्हटलं जातं की, हाच तो अंजेनाद्री पर्वत जिथे हनुमानाचा जन्म झाला आणि सूर्याकडे झेप घेतली आणि जणू सूर्य स्वतःचं रक्षण करू शकत नव्हता म्हणून इंद्राने वज्र फेकलं. वालीच्या भयाने मातंग डोंगरात सुग्रीव लपला होता. रावणाने जेव्हा सीतेला पळवलं तेव्हा तो आकाशमार्गे इथून गेला. इथे सीतेने टाकलेला एक अलंकार सुग्रीवने झेलला. इथेच रामाने वालीचा – त्या काळाचा संदर्भ घेतला तर काहीसा अधर्माने – ‘वध’ केला. आता गोल दगडाशिवाय काही दिसत नाही. गाईड ते डोंगर लांबून दाखवतो. आपण एका दगडावर बसून रामायण डोळ्यांसमोर आणायचे. हे जे काल्पनिक रमणं असतं ना, ते मला प्रचंड आवडतं. माझ्या डोळ्यांसमोर राम-लक्ष्मण आले. सीतेला घेऊन पळणारा रावण, आकाशी झेप घेणारे हनुमान आले. माझ्या लहानपणी मी बाबूभाई मिस्त्र्ााrचे अनेक चित्रपट पाहिले होते. ते हिंदुस्थानी पुराणावर चित्रपट काढत. त्यांचा ट्रिक फोटोग्राफीत हातखंडा होता. त्यांचे रामायण, महाभारतासारखे चित्रपट मी कोळून प्यालो आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गेलो की, त्यातले ते ट्रिक शॉटस् डोळ्यांसमोर येतात. मग मला प्रदीप कुमारमध्ये राम दिसतो किंवा पद्मिनीत सीता.
पण जर हे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं असेल तर काळजी करू नका. तिथे एक ‘हजारा राममंदिर’ आहे. म्हणजे हजार रामाचं देऊळ. ते मंदिर म्हणजे रामायणाचा रिफ्रेशर कोर्स आहे. नाव ‘हजारा’ का दिलंय हे ना गाईड मला सांगू शकला, ना हंपीवरचं एक उत्तम पुस्तक, जे मला रिसर्चला मदत करतं. गाईडचं म्हणणं होतं की, बोलीभाषेत आपण हजार वेळा सांगितलं असं म्हणतो ना, तसं हजार राम तिथे आहेत वगैरे. बोली माहितीतून ते हजारा राममंदिर झालं असेल, पण त्या मंदिरावर रामचरित्र कोरलंय. रामचरित्रातले चक्क एकशे आठ प्रसंग ग्रॅनाईट दगडात चितारले आहेत. ते पाहताना छिन्नीच्या घावातून दगड काय सुंदर कलेचं रूप घेतो हे आपल्याला अचंबित करतं. विजयनगर साम्राज्याच्या पहिल्या देवरायाने हे मंदिर पंधराव्या शतकात बांधलं. ते राजमंदिर होतं.
या मंदिराच्या वेशीवरच्या बांधावर वसंतोत्सवातल्या मिरवणुकीची चित्रं कोरलेली आहेत. त्यात हत्ती आहेत, घोडे आहेत, सैनिक आहेत, चौघडे वाजवणाऱया आणि नाचणाऱया स्त्र्ाया आहेत. विविध ‘जलखेळ’ त्या काळी कसे असत याची कल्पना येते आणि हत्तीघोडे सांभाळणारे मुसलमान नोकर-चाकरही त्यात दिसतात. राजा हिंदू होता, पण सहिष्णू होता हे त्यातून जाणवलं. ही मिरवणूक राजाच्या सिंहासनाकडे कूच करतेय हे ते शिल्प पाहताना कळतं. बऱयाचदा शिल्प जिवंत झाल्याची भावना होते आणि ती शिल्पं जर नीट चाणाक्ष नजरेने पाहिली तर दोन माणसं किंवा दोन जनावरं सारखे दिसत नाहीत. कारण निसर्गात तशी दिसत नाहीत. ती शिल्पं खरीखुरी वाटण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे.
देवळात एक छोटा शिलालेख आहे. त्यात म्हटलंय “देवरायाचं पाम्पादैवी संरक्षण करते.’’ पाम्पादेवी म्हणजे पार्वती. त्याबद्दल पुढच्या वेळी सांगेन, पण देवळाच्या भिंतीवर जे रामायण चितारलंय त्यात वाल्मीकी रामकथा सांगतायतपासून सुरुवात आहे. मग श्रावणबाळाची कथा, दशरथाला दिलेला शाप, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञपासून रामाच्या राज्याभिषेकापर्यंत सर्व काही आहे. काय काय आहे? रावणाचं साधूतून राक्षसात होणारं रूपांतर, हवेतून जाणारा त्याचा रथ, हनुमानाची समुद्रावरची उडी वगैरे. किती वर्षानुवर्षे रामायण आपल्यापर्यंत झिरपत आलंय ते कळतं. ते खरं की खोटं, इतिहास की पुराण हा वाद बाजूला ठेवा. त्याकडे नुसतं एक महाकाव्य, कादंबरी, वाल्मीकीच्या कल्पनेचा आविष्कार म्हणून पाहिलं तरी त्याची भव्यता, त्याची आपल्यावरची चिरंजीव मोहिनी जाणवते. आमची पुस्तकं वर्षानंतर शिळी होतात. हे हजारो वर्षे टिकलंय आणि टिकेल. त्या मंदिरात पूजा होत नाही. कारण मुस्लिम आक्रमणात तिथल्या मूर्ती भंगल्या आहेत, पण हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. फक्त धार्मिक नाही. तो नीट जतन करून ठेवायला हवा. सुदैवाने हंपीने युनेस्कोमान्य जागतिक स्थळांच्या यादीत येतो म्हणून बऱयापैकी सुस्थितीत आहे. हे असे वारसे जपणं हे नवं काही उभारण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. इतकं ते काम मोठं आहे.
– dsanzgiri@hotmail.com